म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारच्या प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर प्रशासकीय कामाचा ठसा उमटविणारे राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. बोंगिरवार यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होत.
मंत्रालयाजवळ मूनलाइट या निवासस्थानी दिवंगत बोंगिरवार यांचे पार्थिव सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, लोकायुक्त एम. एल. ताहिलियानी, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९६६च्या तुकडीचे अधिकारी असलेले बोंगिरवार हे सचोटी आणि निर्णायक नेतृत्त्वगुणामुळे सर्वदूर परिचित असे उत्तम प्रशासक होते. भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक तरुण अधिकाऱ्यांचे ते मार्गदर्शक होते. त्यापैकी अनेक जण सध्या राज्य प्रशासनात सचिव व अन्य महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पंचविसावे मुख्य सचिव म्हणून काम पाहताना राज्याच्या विकासात योगदान दिले.
महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या पक्षांच्या सरकार असताना मुख्य सचिव म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे सचिव म्हणून काम पाहताना मराठवाडा, विदर्भातील दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सूक्ष्म जलसंधारण प्रकल्पांची सुरुवात झाली. त्यांच्या या कल्पनेतूनच पुढे जलसंधारण हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला.
उस्मानाबाद, नागपूर येथे जिल्हाधिकारी, नंतर औरंगाबाद, पुणे, कोकण विभागीय आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
मूळ वैदर्भीय असलेले बोंगिरवार यांनी विदर्भातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी समयोचित आर्थिक तरतूद, विदर्भातील उद्योगांसाठी तेथील खनिज संसाधनांचा विकास करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. जेएनपीटीचे अध्यक्ष असताना त्यांनी तेथे पहिल्यावहिल्या खासगी सागरी टर्मिनलची उभारणी केली होती.
'राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांच्या निधनाने एक द्रष्टा आणि कुशल प्रशासक आपण गमावला आहे. बोंगिरवार यांना प्रशासकीय यंत्रणा व कार्यपद्धतीची अचूक जाण होती.'
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'महाराष्ट्राच्या प्रशासनात दिवंगत बोंगिरवार यांचे महत्त्वाचा सहभाग असून राज्य विकासाच्या प्रक्रियेतही त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने राज्य विकासाची तळमळ असलेला एक कुशल प्रशासक गमावला आहे.'
-अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
'अरुण बोंगिरवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखद आहे. अत्यंत कर्तबगार प्रशासक काळाच्या पडद्याआड गेला आहे. जलसंधारण, सिंचन, प्रशासकीय व्यवस्थेतील सुधारणांसाठी ते नेहमी स्मरणात राहतील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.'
-विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील