म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सरस्वती भुवन शाळेत सुरू करण्यात आलेली अटल टिंगरिंग लॅब विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे केंद्र ठरेल, असा सूर प्रयोगशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या भाषणातून निघाला. विद्यार्थ्यांनी निष्कर्षाची चिंता न करता, नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याकडे लक्ष द्यावे, असेही तज्ज्ञांनी मत मांडले.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जे. एस. गांधी, डॉ. नंदकुमार उकडगावकर, सचिव डॉ. श्रीरंग देशपांडे, मसिआचे अध्यक्ष प्रसाद कोकिळ, संदीप नागोरी, अरुण मेढेकर, मुख्याध्यापक शिरीष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बॅ. गांधी म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करण्यासाठी लॅबचा उपयोग होईल. प्रसाद कोकिळ म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा विकास व्हावा हा या लॅब उभारण्यामागचा हेतू आहे. नागोरी म्हणाले, विद्यार्थ्यांमधील कल्पनांना वास्तवात मांडण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल. डॉ. देशपांडे आपल्या भाषणात म्हणाले, लॅब स्थापन करण्यामागे कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हाच एकमेव उद्देश नसून मुलांना विचार करायला लावणे, प्रयोगातून शिकवणे हा उद्देश आहे. डॉ. उकडगावकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आवडीचा विचार त्यांना तसे घडवणे महत्वाचे आहे. प्रास्ताविक अरुण मेढेकर यांनी केले. समन्वयक शिक्षक मयूर साबळे यांनी लॅबची योजना, कार्यपद्धती याची माहिती दिली. यावेळी डॉ. रश्मी बोरीकर, दीपक पांडे, ज्ञानप्रकाश मोदाणी, प्रमोद माने, प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. जी. एस. खैरनार, मुख्याध्यापक सुषमा उपाध्ये, उपमुख्याध्यापिका नीलिमा देशपांडे, पर्यवेक्षक एल. के. महाजन, बाळासाहेब घुगे यांची उपस्थिती होती. विश्वनाथ दाशरथे यांच्या संगीत मंचाने विज्ञान गीत सादर केले. सूत्रसंचालन धनंजय जोशी तर आभार मुख्याध्यापक मोरे यांनी मानले.
अशी आहे लॅब...
शालेय विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला बळ मिळावे, नाविन्यपूर्ण कल्पना समोर याव्यात या हेतुने अशा हेतुने लॅब उभारण्यात आली. केंद्र सरकारच्या मदतीने उभारण्यात आलेल्या लॅबमध्ये डिजिटल साक्षरता, डिझाइन मेकिंग अशा पाच मॉड्यूलवर काम होते. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येते. यामध्ये रोबोटिक, इंजिनीअरिंग टूल, ड्रोन, सायन्स टेक्नॉलॉजीशी निगडित उपकरणे आहेत.