म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'माझी लोकप्रियता कोणाला तरी खुपत आहे. त्यातूनच माझ्यावर अंबरनाथ येथे हल्ला झाला असावा', अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षाव्यवस्था नव्हती. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मुंबईत भेट घेऊन करणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंबई व ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी निदर्शने तसेच आंदोलने करण्यात आली. आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर आणि मुंबई विभागीय अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे. या हल्ल्यामागे कोणाचे षडयंत्र आहे काय याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज, सोमवारी पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे महातेकर यांनी सांगितले. हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील मलबार हिल, दादर, वांद्रे, चेंबूर, घाटकोपर, रमाबाई कॉलनी, मुलुंड, मालाड, बोरिवली आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथला बंद पुकारण्यात आला होता. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, इगतपुरी, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे काही काळ रेल्वे रोको करण्यात आला. विदर्भात वर्धा येथे बंद पुकारण्यात आला. सोलापूर, बारामती, सातारा, सांगली, बीड आदी जिल्ह्यांमध्ये आठवले गटातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले, असे महातेकर यांनी सांगितले.