म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून कोणत्याही दिवशी सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सज्ज झाले असून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर सुट्टीवर असलेल्या पोलिसांना त्वरित हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले असून १९९२-९३ जातीय दंगलीदरम्यानच्या सर्व गुन्हांचा आढावा घेण्याच्या सूचना मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांची सर्वोतोपरी तयारी सुरू आहे.
महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरता आहे त्यातच सर्वोच्च न्यायालयात अयोध्या खटल्याचा निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे. १० नोव्हेंबरला ईद, १२ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असे लागोपाठ येणारे धार्मिक सण या सर्व परिस्थितीचा विचार करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिवाळीसाठी सुट्टीवर असलेल्या पोलिसांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आले असून गरज पडल्यास आठ तासांऐवजी बारा तास ड्युटी करावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे. मुंबईत जमावबंदनी आदेश जारी करण्यात आले आहेत. अयोध्येतील घटनेनंतर उसळलेल्या जातीय दंगलीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांचा, त्यातील आरोपींच्या सध्यस्थितीचा आढावा सर्व पोलिस ठाण्यांना घेण्यास सांगण्यात आले आहे. नाकाबंदी, वस्त्यांमध्ये गस्त याबरोबरच मोहल्ला कमिटी, उत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांच्या बैठका घेतल्या जात असून सर्वोच्च न्यायालय देणार असलेल्या निकालाचे सर्वांनीच स्वागत करावे. परंतु त्यासाठी जल्लोष वैगेरे करून जातीय तेढ अगर जनभावना दुखावतील आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करू नका किंवा तसे करण्यास कोणालाही प्रवृत्त करू नका, अशा मार्गदशक सूचना या बैठकीत देण्यात येत आहेत.
सोशल मीडियावर विशेष लक्ष
या निकालांनंतर सोशल मीडियावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने 'सोशल भान' राखावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात आलेली कोणतीही पोस्ट शहानिशा केल्याशिवाय पुढे पाठवू नये. धार्मिक भावना दुखावल्या जातील असे फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.