म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाचा मुकाबला करीत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी मंगळवारी दिले. रस्त्यात खड्डे पडू न देणे आणि पडल्यास ते तात्काळ बुजविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेतला. ते म्हणाले की, विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने हवामानाचा अंदाज पाहून रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ
अडकली होती, त्याचा संदर्भ त्यांनी दिला. आपण आपत्तीत बचावकार्य करणार आहोत पण सध्या करोनामुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने, किट्स व मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. सांगली, कोल्हापूरची पुनरावृत्ती नको गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. मुंबईत २००५च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधांनिशी काम करू लागलो. नालेसफाई, त्यांचे खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्त्वाचे आहे. पम्पिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.