विनोद तावडे यांचा विश्वास
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
महाविकास आघाडीची स्थापना झाली असली तरी, नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एकहाती स्वबळावर सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केला. भाजपच्या दोन दिवसीय राज्य परिषदेला शनिवारी नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये शनिवारपासून सुरुवात झाली. यानिमित्ताने तावडे यांनी दुपारी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला यावेळी आमदार गणेश नाईक, भाजपचे पक्षप्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.
राज्य परिषदेच्या सकाळच्या सत्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या या पुढील संघटनात्मक आणि राजकीय वाटचालीविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. राजकीय स्वार्थासाठी जनादेशाचा अनादर करून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ धरली. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली, फडणवीस सरकारने लोकहिताच्या सुरू केलेल्या योजना आकसापोटी हे सरकार बंद करीत आहे, असा घणाघात करीत महाविकास आघाडीचे सरकार हे स्थगिती सरकार आहे, असा आरोप तावडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची रणनीती या राज्य परिषदेत आखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. १६ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून १० हजारांपेक्षा अधिक भाजप प्रतिनिधी उपस्थित राहून ही राज्य परिषद यशस्वी करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तूर्तास तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे वाटत नसल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही. माझी टीका एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. मी पक्षात सक्रिय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.