म. टा. प्रतिनिधी, पुणे
'होस्टेल बंद झाल्याने मैत्रिणीकडे राहत आहे. पाडव्याच्या दिवशीही उपाशी होते. जेवणाची कसलीही सोय नाही. बाहेर पडता येत नाही आणि कुठे काही उपलब्ध नाही. रोजचा दिवस कसा जगायचा हा प्रश्न आहे...'
पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठवाड्यातील एका मुलीचा हा सुन्न करणारा अनुभव. आज जेवण मिळेल का? दोन टिफीन हवे आहेत. घरी जाण्यासाठी काही सोय होईल का? अमुक भागात काही मुले- मुली अडकले आहेत...स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर रोज शेकडोने आदळणारे हे संदेश. पाडवा किंवा रोजचा दिवस या विद्यार्थ्यांसाठी सारखाच उपाशी ठेवणारा ठरत असून समाजाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना दोन घास मिळणार की नाही, हा गंभीर प्रश्न आहे.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन झाल्याने बाहेरगावहून पुण्यात शिक्षणासाठी आलेले हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. खाणावळी बंद असल्याने जेवण नाही आणि वाहतूक बंद असल्याने घर गाठता येत नाही, अशा कात्रीत अडकलेल्या तरुण-तरुणींचा जीव मेटाकुटीला आला आहे.
मॅगी, बिस्किट, वेफर्स यावरच काहींची गुजराण सुरू आहे. प्रशासनातील अधिकारी 'करोना'चा यशस्वीपणे सामना करत असताना भावी अधिकारी जगण्याची लढाई करत आहेत. मदतीच्या संदेशांची संख्या वाढत असल्याने मदत करणारे कार्यकर्तेही हवालदिल झाले आहेत.
पोटातील भूक, घरच्यांची काळजी, 'करोना'च्या संसर्गाची भीती आणि घर गाठता येत नसल्याने त्यांची निकराची लढाई सुरू आहे. सदाशिव पेठ, नवी पेठ, डेक्कन, कर्वे रस्ता, शुक्रवार पेठ, नारायण पेठ या भागात वास्तव्यास असलेल्या आणि इतरत्र विखुरलेल्या विद्यार्थ्यांना कोणाचा आधार? सरकार व प्रशासन, राजकीय नेते व कार्यकर्ते, समाजातील जाणते लोक, शेजारी त्यांना मदत करणार का, अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे.
-------
मदतीसाठी पेठांनुसार 'व्हॉट्सअॅप ग्रुप'
राज्य कर अधिकारी डॉ. कीर्तीराज जाधव यांनी विद्यार्थ्यांचे व्हॉट्स अॅप ग्रुप करून मदतीसाठी नियोजन सुरू केले आहे. 'शहराच्या मध्य भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेठा आणि भागांप्रमाणे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले असून प्रत्येक ग्रुपमध्ये सुमारे शंभर मुले-मुली आहेत. अमुक भागात डबा पाहिजे, असे संदेश सतत येत असून त्यांना मदतीची गरज आहे. काहींनी मदतीची तयारी दाखवली असली, तरी वीस दिवसांचा विचार करता परिस्थिती गंभीर आहे. 'करोना'च्या भीतीमुळे मुले बाहेर पडायला घाबरत आहेत. मदत करणाऱ्यांवर मर्यादा येत आहेत,' असे जाधव यांनी 'मटा'ला सांगितले. वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ म्हणाले, 'फूड पॅकेटचे वाटप केले जात असले, तरी मागणी आणि वितरण यामध्ये मोठी तफावत आहे. अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी दानशूर व्यक्तींची आणि राबणाऱ्या हातांची गरज आहे.'