पाच ठार; नागरी वस्तीमधील पहिलीच दुर्घटना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेनजवळील अत्यंत गजबजलेल्या नागरी वस्तीनजीक गुरुवारी दुपारी खासगी कंपनीचे चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच हाहाकार उडाला. या दुर्घटनेत विमानातील चौघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला; तर अन्य तीनजण जखमी झाले. विमान मोकळ्या जागेत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरी वस्तीत विमान कोसळण्याची ही मुंबईतील पहिलीच घटना आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाला दिले आहेत.
दुपारी १.१० च्या सुमारास जीवदया लेनवरील सर्वोदय हॉस्पिटलपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर ही घटना घडली. व्ही. वाय एव्हिएशन या खासगी कंपनीच्या 'किंग एअर, सी- ९०' या १२ आसनी विमानाने जुहू येथून उड्डाण केले. काही तांत्रिक चाचण्या केल्यानंतर ते विमानतळाकडे परतत होते. विमानतळापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत वैमानिक प्रदीप राजपूत, सहवैमानिक मारिया झुबेर, इंजिनीअर सुरभी, तंत्रज्ञ मनीष पांडे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर गोविंद दुबे हा पादचारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
मोठी हानी टळली
विमान ज्या भागात कोसळले त्या भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. जवळच सर्वोदय हॉस्पिटल, जागृती नगर, जीवदया लेन परिसरात दाटीवाटीची वस्ती आहे. हॉस्पिटलला लागूनच एल.बी.एस. रोड आहे. तिथे वाहतुकीची वर्दळ असते. जवळून घाटकोपर वर्सोवा मेट्रो १ चा मार्ग जातो. या मार्गावरूनच विमानांची ये-जा सुरू असते. विमान वस्तीवर कोसळले असते तर मोठी मनुष्यहानी झाली असती. आपत्कालीन लँडिंगसाठी वैमानिक मोकळी जागा शोधत असावा. त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा मोकळा परिसर नजरेस पडल्यानंतर वैमानिकाने लँडिंगचा निर्णय घेतला असावा.
मारियाच्या सूचनेकडे दुर्लक्ष?
विमानाची चाचणी घेऊ नका, हवामान खराब आहे अशी सूचना सहवैमानिक मारियाने केली होती. परंतु तिच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून विमानाचे उड्डाण करण्यात आल्याचा आरोप मारियाचे पती प्रभात कथुरिया यांनी केला आहे.
२०१४ मध्येच विक्री
विमानावर 'उत्तर प्रदेश' असा लोगो असल्याने या विमानात उत्तर प्रदेश सरकारचे कोणी वरिष्ठ होते की काय, अशी चर्चा सुरू होती. मात्र मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाने काही क्षणांतच चित्र स्पष्ट केल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव अवनीश अवस्थी यांनीही या विमानाची २०१४ सालीच विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट केले.