म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
चेंबूर येथील सरगम इमारतीस लागलेल्या आगीत अग्निसुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारतीच्या अग्निसुरक्षेत गंभीर त्रुटी आढळल्या असून आग लागली तेव्हा आपत्कालीन स्थितीतील सुटकेच्या मार्गाकडील (रेफ्युजी एरिया) दरवाजे बंद असल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे. म्हाडाच्या जमिनीवर उभारलेल्या सरगम इमारतीत २७ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीने पाच जणांचा बळी गेला होता.
मुंबईतील अग्निसंहाराची झळ बसलेल्या सरगम इमारतीतील अग्निसुरक्षेतील कमतरता जाणून घेण्यासाठी म्हाडाने आढावा घेण्याचा निर्णय घेतला. या गृहनिर्माण संस्थेने म्हाडाकडे ओसीसाठी अर्ज केल्याचा दावाही यापूर्वीच पोकळ निघाला आहे. तशातच अग्निसुरक्षेसाठी योग्य ती काळजी न घेतल्याचे आढळून आले आहे. या आगीत अग्निशमन दलाचे काही कर्मचारीही जखमी झाले.
१६ मजली सरगम इमारतीतील १०व्या मजल्यावर ही आग लागली होती. आग विझवण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणाही पाण्याच्या पाइपलाइनशी योग्य पद्धतीने जोडलेली नव्हती. याची गांभीर्याने दखल घेत म्हाडाने नव्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेत कमतरता राहू नये म्हणून अधिक जागरुक राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. तशी कमतरता आढळल्यास त्या संबंधित गृहनिर्माण संस्थांना नोटीस देण्यात येईल.