दिग्गज नेत्यांच्या कार्यक्रमानंतर महापालिकेचे दुर्लक्ष
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
व्ही. के. हायस्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांसाठी महापालिकेने रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली होती. एक दिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर तात्पुरत्या डागडुजीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांची गैरसोय झाली असून रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे.
पनवेल शहरातील सावरकर चौकातून धूतपापेश्वर कारखान्यामार्गे वडाळे तलावाच्या दिशने जाणारा रस्ता मुंबई-पुणे महामार्गाला मिळतो. व्ही. के. हायस्कूलच्या शतक महोत्सवी कार्यक्रमानिमित्ताने मागील आठवड्यात, २९ डिसेंबर रोजी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित होते. दोन नेते आणि संस्थेचे हजारो विद्यार्थी येणार म्हणून महापालिकेने या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली होती. ही डागडुजी हलक्या दर्जाची असल्यामुळे अवघ्या दोन दिवसांतच खड्डे भरलेल्या जागेतून माती बाहेर पडून या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वडाळे तलावाच्या शेजारी सकाळी पनवेलमधील नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. याच मार्गावरून व्ही. के. हायस्कूलमधील हजारो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. नागरिकांना या धुळीतून मार्ग काढावा लागतो आहे. तसेच, या परिसरात असलेल्या दुकानचालकांनाही धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. डांबराचा वापर न करता, मातीचा भराव टाकून रस्त्याची डागडुजी केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावरील बांठिया बंगल्याच्या समोरदेखील हीच परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिकेने अत्यंत घाईघाईने या रस्त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही डागडुजी म्हणजे केवळ मलमपट्टी असून कायमस्वरूपी केलेली नाही. नागरिकांना धुळीमुळे त्रास होत आहे. आठ दिवस उलटल्यानंतरही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदार कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त व्हावा.
मुकंद गोंधळेकर, नागरिक