अ‍ॅपशहर

‘कॉलनी विकास फोरम’ मैदानात

शहरात राहून वर्षानुवर्षे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला महापालिकेत नगरसेवक बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र पक्षनेतृत्वाने स्थानिक नेत्याला प्राधान्य देत कॉलनी म्हणजेच शहरात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले आहे. इच्छुक उमेदवार म्हणून नेत्यापुढे तिकीट मागण्यासाठी गेलेल्या अनेकांना नेत्यांनी ठेंगा दाखविल्यामुळे नाराज कॉलनी रहिवाशांनी एकत्र येऊन ‘फोर के कॉलनी फोरम’ स्थापन करून निवडणुका लढविण्याची तयारी केली आहे.

Maharashtra Times 30 Mar 2017, 9:48 pm
पनवेल निवडणुकीत राजकीय पक्षांना आव्हान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम colony vikas forum will contest elections of panvel corporations
‘कॉलनी विकास फोरम’ मैदानात


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

शहरात राहून वर्षानुवर्षे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला महापालिकेत नगरसेवक बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र पक्षनेतृत्वाने स्थानिक नेत्याला प्राधान्य देत कॉलनी म्हणजेच शहरात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले आहे. इच्छुक उमेदवार म्हणून नेत्यापुढे तिकीट मागण्यासाठी गेलेल्या अनेकांना नेत्यांनी ठेंगा दाखविल्यामुळे नाराज कॉलनी रहिवाशांनी एकत्र येऊन ‘फोर के कॉलनी फोरम’ स्थापन करून निवडणुका लढविण्याची तयारी केली आहे.

पनवेल महापालिका हद्दीत कामोठे, कळंबोली, खारघर, खांदा कॉलनी यांच्यासह नवीन पनवेल या मोठ्या वसाहती आहेत. सुमारे ३० वर्षांपूर्वी सिडकोने वसविलेल्या वसाहतींमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर भारताच्या सर्व भागांतून आलेला नागरिक राहतो. अनेक वर्षे येथे राहिल्यामुळे मूळ गावांचा विसर पडून ते कॉलनीकर झाले आहेत. गावांपेक्षा कॉलनीत राहणारी लोकसंख्या, मतदारसंख्या तुलनेने मोठी आहे. पूर्वी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये साहजिकच येथील स्थानिक सत्ताधारी होते. महापालिका झाल्यानंतर कॉलनीत राहणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आता वसाहतीतील नागरिकांचे प्रतिनिधित्व आपल्याला करता येईल, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र उमेदवारी देताना पक्ष नेतृत्वानेच डावलल्यामुळे स्थानिकांप्रमाणे कॉलनीकरांचा स्वाभिमान जागा होऊन ‘फोर के कॉलनी फोरम’ स्थापन करण्यात आली आहे. इंग्रजी मूळाक्षरे असलेल्या ‘के’ अक्षरापासून कामोठे, कळंबोली, खारघर, खांदा कॉलनी अशी नावे तयार होत असल्याने ‘फोर के’ असे नाव ठेवण्यात आले आहे.

एका वसाहतीतून १२पेक्षा अधिक उमेदवार निवडून दिले जाणार असल्यामुळे महापालिकेच्या एकूण ७८ नगरसेवकांमध्ये शहरी भागातून निवडून गेलेल्या नगरसेवकांची संख्या अधिक असणार आहे. त्यामुळे आम्हाला संधी द्या, अशी मागणी भाजप, शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा कार्यकर्त्यांनी नेतृत्वाकडे केली होती. मात्र उमेदवारांची निवड करताना शहरी भागातील नागरिकांना डावलले जात असल्याचा अनुभव सगळ्यांना आला. येथील धंदे, व्यवसाय ही कोणा एकाची मक्तेदारी आहे का, असा सवाल कॉलनी फोरमने केला आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘फोर के’ संस्थेची स्थापना केली आहे, अशी माहिती पवन कुमार यांनी दिली. कॉलनी फोरम आपले उमेदवार निवडणुकीत उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक राजकीय पक्षांना फोरमचे आव्हान पेलावे लागणार आहे.


मनात भीती

शहरी वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांवर कायम स्थानिक राजकारण्यांबद्दल भीती राहिली आहे. त्यामुळे कॉलनी फोरमचे काम सोशलमीडीयावर सुरू आहे. समोर येऊन उघडपणे प्रचार केल्यास स्थानिकांकडून मारहाण होण्याची भीती असल्याचे एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज