अ‍ॅपशहर

पोलिस छळाविरोधात तक्रार करा

कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच एखाद्या नागरिकाला त्रास दिला जाण्याच्या अथवा त्याला विनाकारण एखाद्या प्रकरणात गोवण्याच्या घटना अनेकदा उघडकीस आलेल्या आहेत. अशा वेळी तक्रार करायची

Maharashtra Times 13 Nov 2017, 4:00 am
नवी मुंबईत लवकरच स्वतंत्र कार्यालय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम complaint against police torture
पोलिस छळाविरोधात तक्रार करा


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच एखाद्या नागरिकाला त्रास दिला जाण्याच्या अथवा त्याला विनाकारण एखाद्या प्रकरणात गोवण्याच्या घटना अनेकदा उघडकीस आलेल्या आहेत. अशा वेळी तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्न संबंधित तक्रारदाराला नेहमीच सतावत असतो. त्यासाठी राज्याच्या गृह विभागाने स्वतंत्र पोलिस तक्रार प्राधिकरणाची स्थापना केली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यातील पोलिस अत्याचारविरोधात नागरिकांना दाद मागता यावी, याकरिता या प्राधिकरणाचे कार्यालय लवकरच नवी मुंबईत सीबीडी बेलापूर येथे निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतंत्र पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे प्रत्यक्ष, पोस्ट अथवा ऑनलाइनच्या माध्यमातून आपल्या तक्रारी मांडता येणे शक्य होणार आहे.

पोलिस दलात कार्यरत असलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पदाचा गैरवापर करून नागरिकांचा छळ झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांच्या या छळाविरोधात दाद मागण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या तक्रार अर्जाची वरिष्ठ पातळीवर दखलही घेतली जात नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी राज्यात पोलिस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार राज्याच्या गृह विभागाने राज्याबरोबरच विभागीय स्तरावरही अशा प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकण विभागासाठी स्वतंत्र पोलिस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. कोकण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांसाठी हे प्राधिकरण असणार आहे. या प्राधिकरणाचे कार्यालय सीबीडी बेलापूर येथील नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात असेल. नवीन वर्षात हे कार्यालय सुरू होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कोकण विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणासाठी गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश निर्मला भिडे यांची अध्यक्ष, तर नवी मुंबई पोलिस दलातील प्रशासन विभागाचे विद्यमान सहाय्यक पोलिस आयुक्तांची सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ठाणे वाहतूक शाखा आणि भिवंडी परिमंडळ येथे उत्कृष्ट पोलिस सेवा बजावलेले सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त सुधीर दाभाडे आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील मुख्यालयाचे विद्यमान पोलिस उपायुक्त यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे.

पोलिस अधिकारी अथवा पोलीस कर्मचाऱ्यांकडून झालेला छळ, पोलिस कोठडीतील मृत्यू, कायद्याचा गैरवापर करणे अशा अनेक स्वरूपाच्या तक्रारींबाबत या प्राधिकरणाकडे दाद मागता येणार आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींबाबत संबंधित पोलिस आयुक्तालयामधून सविस्तर माहिती घेऊन तक्रारदार आणि पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. यानंतर चौकशीअंती समितीकडून प्राप्त बाबी लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज