म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'मराठा समाजाला याच अधिवेशनात स्वतंत्र आरक्षण दिले जाईल. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कालबद्ध रितीने कार्य अहवाल मांडण्यात येईल', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. त्याचवेळी 'विरोधकांच्या मनात काळंबेरं असून, त्यांना दोन समाजांत तेढ निर्माण करायची आहे', असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे आरक्षणाबाबतचे उत्तर तसेच सर्वपक्षीय बैठकीनंतरही सभागृहात विरोधक आक्रमक दिसून आले. त्यामुळे आरक्षणावरून राजकीय वातावरण पेटले आहे.
मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मंगळवारी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधकांनी सरकारला घेरले. त्यानंतर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 'मागासवर्ग आयोग ज्या कायद्यानुसार स्थापन केला, त्यामध्ये कृती अहवाल देण्याबाबतच्या सूचना आहेत. यापूर्वीच्या सरकारांनी ५१ अहवाल आणले. मात्र, ते अहवाल सभागृहात मांडण्यात आलेले नाहीत. सध्याचा ५२वा अहवाल आहे. मराठा विधेयक मांडण्याआधी सभागृहासमोर हा अहवाल ठेवण्यात येईल. ओबीसी समाजाला जे आरक्षण दिले आहे, त्याला धक्का लागणार नाही. मराठा समाजाला याच अधिवेशनातच स्वतंत्र आरक्षण दिले जाईल', असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विरोधक आक्रमक...७)
मुस्लिम आरक्षणावरून टोला
'यापूर्वी सत्तेत असलेल्या विरोधकांनी मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही. त्यातील काही जातींनाच आरक्षण दिले. मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही दिली नाही. विरोधकांनी मुस्लिम समाजाला फसवले आहे. हे फक्त मतांसाठी मुस्लिमांचा वापर करीत आले आहेत', अशी टीका करतानाच, 'आम्ही प्रत्येक समाजाच्या पाठिशी आहोत', अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.