म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
द्रोणागिरी डोंगरमाथ्यांवरील श्रीक्षेत्र द्रोणागिरी माता मंदिर हे पर्यटनस्थळ व्हावे, अशी मागणी करंजा ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आले असून राज्य सरकारने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत द्रोणागिरीमाता मंदिराचा परिसर सुशोभित करण्यासाठी १५ लाखांचा निधी जाहीर केला आहे.
तुळजापूरची भवानीमाता, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका माता, नाशिक इथल्या वणीची सप्तश्रुंगी (अर्धे शक्तीपीठ) अशी साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. या साडेतीन शक्तीपिठांव्यतिरिक्त आदिमाया शक्तीची अनेक श्रद्धास्थाने महाराष्ट्रात आहेत. अरबी सुमद्राच्या करंजा खाडीकिनारी डोंगरमाथ्यांवरील श्री द्रोणागिरीमातेचे मंदिर अनेक वर्षांपासून प्रसिद्धीपासून दूर राहिले आहे. रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. द्रोणागिरी परिसरात तिसऱ्या नवी मुंबईचा विकास होत असताना भविष्यात येणारे विमानतळ, रेल्वे प्रकल्प, न्हावा-शिवडी लिंक रोड, जेएनपीटी बंदर आणि औद्योगिकीकरणाचा विकास साधत असताना या विभागाला सिडकोने द्रोणागिरी नोड असे नाव दिले आहे.
वैदपुराणकालीन श्रीक्षेत्र द्रोणागिरीमातेच्या मंदिरासह या परिसराचा विकास करून या ठिकाणी अद्ययावत पर्यटनस्थळ निर्माण करावे, अशी मागणी करंजा ग्रामस्थांकडून २०१३पासून सातत्याने केली जात होती. ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिकांना स्वयंरोजगार मिळावा, यासाठी राज्य सरकारने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत श्रीक्षेत्र द्रोणागिरीमाता मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी १५ लाखांचा निधी जाहीर केला असल्याने ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.