म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक घोषणा करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच दिले होते. मात्र, मराठा समाजाला दिलासा देणारे शब्दच त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यापूर्वीच त्यातील माहिती सार्वजनिक केल्याबद्दल संबंधितांवर हक्कभंग आणण्याची घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
'मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शिफारशी करणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा', असा सवाल विखे पाटील यांनी शनिवारी मुंबईत केला.
'हा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नाही. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशाच्या आधारे आरक्षणाची घोषणा करतात, असा प्रश्न आहे. त्यामुळेच यासंदर्भात आपण संबंधितांवर हक्कभंग आणणार आहोत', असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणाला बसलेले मराठा क्रांती मोर्चाचे प्रा. संभाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांची विखे पाटील यांनी भेट घेतली. प्रा. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून विखे पाटील यांनी त्यांच्या मागण्यांबाबत माहिती घेत, उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी विखे पाटील म्हणाले, 'मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अजून विधीमंडळाच्या पटलावर सादर झालेला नाही. तो अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. त्यात नेमक्या काय शिफारसी आहेत, ते अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. या परिस्थितीत मराठा समाजाने १ डिसेंबरला जल्लोष करावा, असे मुख्यमंत्री कशाच्या आधारावर सांगतात', असे विखे पाटील म्हणाले.
राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगताच विखे पाटील यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलनाच्या ठिकाणी पाठवण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
राज्यात संदिग्धता
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रसारमाध्यमांना मुलाखती देत सुटले आहेत. या अहवालाबाबत आज संपूर्ण राज्यात संदिग्धता निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमातून सूत्रांच्या आधारे समोर आणलेल्या अस्पष्ट निष्कर्षांमुळे मराठा व ओबीसी समाजात तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. यामागे राज्यातील वातावरण तापवण्याचा सरकारचा डाव आहे काय, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.