गावे रिकामी करण्यासाठी १५ जूनची मुदतही उलटणार
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
उन्हाळा संपून पावसाळ्यास सुरुवात झाली असली, तरी विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व जागेचा ताबा अजूनही सिडकोला मिळालेला नाही. उलवा आणि कोंबडभुजे गावातील ८० टक्के लोकांनी गावे रिकामी केलेली नाहीत. ही गावे रिकामी करण्यासाठी १५ जून ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. मात्र अजूनही गावे पूर्णपणे रिकामी झाली नसल्याने ही मुदतही उलटून जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिडकोचा मुदतींचा पाढा सुरूच असल्याचे दिसत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी गाभा क्षेत्रातील कामे करण्याकरिता संपूर्ण जागेचा ताबा मिळणे गरजेचे आहे. यासाठी लागणाऱ्या जागेसाठी दहा गावे उठवली जात आहेत. मात्र यातील उलवे आणि कोंबडभुजे या दोन गावांतील ८० टक्के लोकांनी अजूनही गावे रिकामी केलेली नाहीत. त्यामुळे जागेचा प्रश्न सुटलेला नाही. गावे रिकामी करण्यासाठी ग्रामस्थांना अनेक प्रस्ताव देण्यात आले आहेत. अनेकदा मुदतीही देण्यात आल्या आहेत. मात्र या मुदती उलटूनही गावे पूर्णपणे रिकामी झालेली नाहीत. आता १५ जूनपर्यंत गावे रिकामी केल्यास घरासाठी प्रति फूट १५०० रुपयांचा दर दिला जात आहे. १५ जूननंतर तो १००० रुपये इतका होईल, असेही अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र तरीदेखील गावे पूर्णपणे रिकामी झालेली नाहीत. उलवे गावातील फक्त आठ ते दहा रहिवाशांनी आपली घरे तोडून स्थलांतर होण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पूर्ण गावे रिकामी होण्याचा प्रश्न जैसे थेच आहे.
मागण्या मान्य झाल्यास घरे सोडणार
एका वर्षामध्ये गावे रिकामी करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र पुनर्वसनाबाबतच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही गावे रिकामी करणार नसल्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे दुसरा पावसाळा आला, तरी ग्रामस्थांनी आपली घरे सोडलेली नाहीत. ही तारीख उलटून जाईल आणि दुसरी मुदत येईल, अशी चर्चाच गावात आहे. मात्र आमच्या मागन्या मान्य झाल्या की, आम्ही लगेच घरे सोडून गाव रिकामी करून जायला तयार आहोत, अशी माहिती ग्रामस्थ मंडळाचे पुंडलिक म्हात्रे यांनी दिली. या बाबत त्यांनी काही दिवसांपूर्वी सिडकोच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. सिडकोने आता दिलेली मुदतही उलटून जाणार असल्याचेच चित्र आहे. त्यामुळे सिडकोला सर्व जागेचा ताबा कधी मिळणार, हा प्रश्न प्रलंबितच आहे.