मुंबईत कार्यरत असलेल्या तिघांना करोना
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
शनिवारी करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या आलेल्या, मुंबई पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा उपचार सुरू करताच अवघ्या काही तासांतच मृत्यू झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली. कामोठ्यातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीच्या कुटुंबातील तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला. याशिवाय पनवेलमधील तीन जणांना करोना झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले. विशेष म्हणजे हे तिघेही दररोज मुंबईत ये-जा करणारे आहेत.
मुंबई पोलिस दलात पोलिस कर्मचारी म्हणून काम करणारे कामोठ्यातील रहिवासी दररोज नवी मुंबई ते सीएसटी असा प्रवास करीत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांनी चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ते कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात शनिवारी उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. ते कॅन्सर रुग्णही होते. या पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी, मुलगा आणि मुलीची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती पनवेल महापालिकेकडून देण्यात आली. याशिवाय पनवेलमधील वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. हे तीनही रहिवासी विविध कामांसाठी दररोज मुंबईत प्रवास करणारे आहेत. यामध्ये ५१ वर्षीय बेस्ट चालकाचा समावेश आहे. ते कामोठ्यात राहणारे आहेत. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या ५० वर्षीय महिलेलादेखील करोनाची बाधा झाली. ही महिला पनवेल शहरातील रहिवासी आहे. याशिवाय मुंबईत सीए म्हणून कार्यरत असलेल्या, खारघरचे रहिवासी असलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीलादेखील करोना झाल्याचे समोर आले.
----
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे संक्रमण थांबवा
पनवेल महापालिका क्षेत्रात तसेच पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारे अनेक नागरिक मुंबईत कामासाठी जातात. अत्यावश्यक सेवेत काम करणारे नागरिक दररोज घरी येत असल्यामुळे करोनाचे संक्रमण होण्याची भीती आहे. पनवेलमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांच्या संसर्गामुळे करोना झाल्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून मुंबईत विविध रुग्णालयांत, महापालिकेत काम करणाऱ्या नागरिकांना संसर्ग होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतच करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.