नवी मुंबई : राजकारणात आपल्याकडे एक व्यक्ती, एक मत असले तरी सामाजिक, आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समानमूल्य हे तत्त्व आपण नाकारत आहोत. आपण जर ते अधिक काळापर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट मत अॅड. धनंजय माने यांनी ऐरोली येथे व्यक्त केले.
ऐरोलीतील नालंदा विपश्यना केंद्रात बहुजन हितकारिणी सभा, प्रशिक औद्योगिक संस्था आणि प्रबुद्ध युवा ग्रुप यांच्यातर्फे संविधान साक्षरता अभियानांतर्गत भारतीय संविधानातील मूल्य व आजची आव्हाने या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना माने यांनी राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही, असे स्पष्ट करतानाच मतपेटीच्या राजकारणात आपण सजग व जागरूक नागरिकाची भूमिका बजावली पाहिजे, असे अवाहन केले.