सदस्यांनी ढिसाळ कारभाराची लक्तरे टांगली वेशीला
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेची आरोग्यसेवा पूर्णपणे ढासळली आहे. या विभागात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी कामापेक्षा राजकारण करण्यात व्यग्र असतात. त्यामुळे या विभागाच्या कारभारात गेल्या पाच वर्षांत कोणतीही सुधारणा झालेली नाही. जर शहरातील गोरगरीब नागरिकांना चांगले उपचार मिळत नसतील, तर महापालिकेची भरलेली तिजोरी काय कामाची, असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी उपस्थित केला. आरोग्याच्या कारभारावर नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडताना त्यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढले.
नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर वारंवार टीका करून कारभारात काहीच सुधारणा होत नसल्याने विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधाण सभेत आरोग्याच्या विषयावर लक्षवेधी सूचना मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेत नाही, तर निविदांमध्ये जास्त रस आहे. खासगी कंत्राटदारांची दुकाने चालविण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे प्रशासनाने मंजूर केलेला निधीही रुग्णसेवेवर खर्च होत नाही. त्यामुळे आयुक्तांनी आरोग्य विभागात राजकारण करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हटविण्याची मागणी चौगुले यांनी केली.
आरोग्य विभागासाठी केपीएमजी या संस्थेची सल्लागार म्हणून २०१६मध्ये नियुक्ती केली, मात्र त्या संस्थेने आजवर काय सल्ला दिला, हे मात्र लोकप्रतिनिधींना समजलेले नाही. तसेच या सल्लागार संस्थेला आतापर्यंत कशाच्या आधारावर मुदतवाढ देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरू असलेला सावळा गोंधळ कुठेतरी थांबला पाहिजे आणि नवी मुंबईतील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा दिली गेली पाहिजे, असे विजय चौगुले यावेळी म्हणाले. या लक्षवेधीवर बोलताना ज्येष्ठ नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी महापालिकेच्या रुग्णालयात स्वच्छता आहे का, शौचालय सुस्थितीत आहेत का, रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत का, आहारतज्ज्ञ उपलब्ध आहेत का, अशा प्रश्नांचा मारा करत प्रशासनाला धारेवर धरले. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महापालिका रुग्णालयात दक्षता विभाग (व्हिजिलन्स) असला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक विभागावर नियंत्रण ठेवून कामात पारदर्शकता आणता येईल, अशी सूचना त्यांनी केली. नगरसेविका सुनीता मांडवे यांनी महापालिका रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असेल तर खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याची सूचना यावेळी मांडली. आरोग्य विभागाचे कामकाज ढेपाळल्यामुळे महापालिका सर्वाधिक बदनाम झाली असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी केला. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेल्या डॉक्टरांची भरती प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले. निवड करण्यात आलेले डॉक्टर कायमस्वरूपी काम करण्यासाठी तयार असून त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
खासगी रक्तपेढींवर भर
नगरसेवक घनश्याम मढवी यांनी महापालिका रुग्णालयात पॅथॉलॉजीच्या नावावर रॅकेट कार्यरत असल्याची शंका उपस्थित केली. महापालिका रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना मर्जीतल्या लॅबमधून रक्त चाचण्या करायला भाग पाडत असल्याचा आरोप केला. नगरसेवक किशोर पाटकर, नामदेव भगत, सोमनाथ वास्कर, संजू वाडे, मनोज हळदणकर, राजू शिंदे, ममीत चौगुले, रंगनाथ औटी यांनीदेखील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले.