म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होईल, शिवसेनेसोबत चर्चेचे दरवाजे खुले आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला. तसेच शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्याशिवाय भाजप सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार नाही, असे भाजप नेत्यांच्या बैठकीत ठरले. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्याने भाजपची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे हे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, 'शिवसेनेकडून आम्हाला अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, आम्ही वाट बघत आहोत.' 'राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. चर्चा होईल आणि मार्ग लवकरच निघेल. शिवसेनेशी चर्चा होईल आणि लवकरच गोड बातमी आपल्याला मिळेल', अशी आशा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
'चर्चेचे दरवाजे खुले आहेत'
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2019, 4:00 am