म. टा. प्रतिनिधी, बीड
पाणी टंचाईवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर वॉर रूम स्थापन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी घेतला. त्यानुसार विविध निर्णय घेण्यात आले आहेत. सर्व टँकरवर जीपीएस यंत्रणा बंधनकारक असून त्याद्वारे टँकरच्या हालचालींवर वॉररूममधून लक्ष ठेवले जाणार आहे. या हालचालींचे निरीक्षण थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असून गावकरी व नागरिकांना त्यांच्यापर्यंत पिण्याचे पाणी टँकरद्वारे पोहोचले की, नाही याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देता यावी. यासाठी जिल्हा प्रशासन टोल फ्री नंबर प्रसिद्ध करणार आहे.
पाणीटंचाई बरोबरच मनरेगा व दुष्काळी कामांबाबत नागरिक आपल्या तक्रारी या टोल फ्री क्रमांकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू शकतील. वॉर रूममधून टॅँकरवरील निरीक्षणाची पडताळणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी केली. याबाबतचे नियंत्रण जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या नियंत्रणात होणार आहे.