म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या करोनाबाधितांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून तफावत दिसून येत आहे. राज्य सरकार व पालिकेच्या कार्यपद्धतीतील फरकामुळे ही तफावत दिसून येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक रुग्णालयाच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळांसह खासगी लॅबकडूनही कोविड -१९ च्या संदर्भातील तपासण्या आता वाढल्या आहेत. मात्र, हे निदान अहवाल कस्तुरबा रुग्णालयामध्ये पुन्हा पडताळून पाहिल्याशिवाय राज्य सरकारच्या यंत्रणेकडून ते ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे ही तफावत येते.
पालिकेकडून राज्य सरकारला ही आकडेवारी दिली जाते. मात्र, स्थानिक यंत्रणा असलेल्या कस्तुरबा रुग्णालयाकडून मिळणारी माहिती अधिक जलद असते. त्यात खासगी प्रयोगशाळांमधून आलेल्या निदान चाचण्यांचाही समावेश असतो. दुसरीकडे राज्य सरकारकडे येणाऱ्या कोव्हिड १९ च्या अहवालासोबत वैद्यकीय अहवालांच्या प्रतीची जोड असावी लागते. ती उपलब्ध न झाल्यास त्या रुग्णांचा समावेश कोव्हिडच्या रुग्णसंख्येमध्ये केला जात नाही. खासगी प्रयोगशाळांमध्ये केली जाणारी कोविडसाठी तपासणी ही कस्तुरबामध्ये केल्या जाणाऱ्या तपासणीप्रमाणेच आहे का, याचा तुलनात्मक अभ्यास केला जातो, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.