म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
एकीकडे चंद्रपूर अजूनही ४६ अंश सेल्सिअसवर तापलेले असताना, हवामान विभागाने शुक्रवारी अंदमानात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली असून, त्यामुळे राज्यभरातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान्सून प्रत्यक्ष राज्यात दाखल झाला नसला तरी त्याच्या अंदमानातील आगमनाच्या वार्तेनेही उन्हाळ्याची तीव्रता कमी झाल्याची जाणीव झाली. शुक्रवारी मुंबईकरांनी काहीशा ढगाळ वातावरणाचाही अनुभव घेतला.
आग्नेयेकडील बंगालच्या उपसागराचा भाग, दक्षिण अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटे येथे मान्सून सक्रीय झाला असून दक्षिण अरबी समुद्र, मालदिव आणि अंदमान-निकोबारचा उर्वरित भाग व्यापण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ४८ तासांमध्ये मान्सूनचा या भागातील प्रवासही वेगाने होईल, असे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याबरोबरच दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडूच्या काही भागांमध्येही मान्सून सक्रीय झालेला आढळून येईल. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले की मग गोवा-कोकणमार्गे पाऊस राज्यात प्रवेश करेल. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिला तर हवामान विभागाने अंदाज वर्तवल्याप्रमाणे वेळेआधी मान्सून देशात दाखल होण्याची शक्यता आहे.
लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कर्नाटक येथे गेल्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडला. लक्षद्वीप आणि केरळ येथे दोन ठिकाणी मुसळधार पावसाचीही नोंद झाली. केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, कर्नाटकचा दक्षिणेकडील भाग येथे आज, शनिवारपासून बहुतांशी भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथेही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मच्छिमारांना इशारा
भारतीय हवामान विभागाकडून वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार मालवण ते वसई या किनारपट्टीवर शनिवारी रात्री साडेअकरापर्यंत ३ ते ३.२० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.