म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'नैतिकता हाच बुद्ध धम्माचा गाभा आहे. गौतम बुद्धाने वेद आणि ऋग्वेदाला नाकारून मानव्याचे तत्त्वज्ञान रुजवले. कालांतराने त्यांचा धम्म समाजासमोर आंधळेपणाने आणण्याचा प्रयत्न झाला. डॉ. आंबेडकरांनी मात्र त्यांच्या तत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी करून धम्माचे तत्त्वज्ञान समोर आणले, असे मत ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांनी व्यक्त केले.
बुद्ध जयंतीनिमित्त धम्म संघ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्माकडे वाटचाल' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे व्याख्यान झाले.
गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान समजण्यासाठी वैचारिक प्रवास झाला पाहिजे, असे मत व्यक्त करुन ते म्हणाले, 'मानवी अस्तित्व असेपर्यंत बुद्धाचे तत्त्वज्ञान अस्तित्वात राहणार आहे. बुद्धांचा धम्म म्हणजे नीतीतत्व असून धर्म हा अवडंबर आहे. उपासना म्हणजे भक्तीचा मार्ग अनुसरणे आहे. हे समजून घेतले पाहिजे.
ते म्हणाले, 'जगातील बाकीच्या धर्मसंस्थापकांची निश्चित अशी जयंती नाही, ती फक्त गौतम बुद्धांची आहे. बुद्ध हा ऐतिहासिक पुरुष आहे, पौराणिक नाही. बुद्ध कल्पनेतून जन्माला आलेला नाही. माणसाने माणसाशी कसे वागावे याला धम्म म्हणतात. ज्यांनी आत्मा नाकारला त्यांना 'महात्मा' अशी उपाधी देणे चुकीचे आहे. धर्माची लक्षणे वजा करून उरतो तो 'धम्म.''
गौतम बुद्धांच्या नावाने आज हिंदुत्ववाद रुजवण्याचे काम सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले की, भिक्षुक म्हणून फुकट जगणाऱ्या ब्राह्मणांच्या हातात बौद्ध धम्माची अधिसत्ता होती. धम्माला ब्राह्मणी लागण झाल्याने तो विशुद्ध स्वरूपात उरला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाचे पहिले डोळस अनुयायी आहेत. देव नाकारणाऱ्या धम्माचा पाया नैतिकतेवर उभा आहे. धर्माने बांधलेल्या लोकांच्या गळ्यात घुंगरु अडकवलेले असतात. आजचे भिक्षू हे लोकांमध्ये दुही माजवतात. लायक माणूस या देशात नालायक ठरतो ही या देशाची शोकांतिका असल्याचेही ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रा. अशोक चोकाकर यांनी केले. सूत्रसंचालन शामली कपूर हिने तर आभार महाबोधी पद्माकर यांनी मानले.