म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून, यादरम्यान शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला न जुमानता मुंबईतील काही कॉन्व्हेंट शाळांनी सुट्टी रद्द करत या कालावधीत चक्क परीक्षा ठेवली आहे. यामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली असून, संबंधित शाळांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. याविरोधात आता युवा सेनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे धाव घेतली आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यात घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण वाढत असून, या कालावधीत मुंबईतील बहुतांश विद्यार्थी गावाला जातात. त्यामुळे गणेशोत्सवात शाळांना पाच दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार शासन निर्णयही जाहीर करण्यात आला असून, या काळात शाळांनी परीक्षा घेऊ नये, असेही आदेश दिले होते. परंतु तरीही दादर येथील कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल ही शाळा केवळ सुरूच ठेवण्यात आली नव्हती, तर तेथे खुली पुस्तक परीक्षाही घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
'शाळांना किती सुट्टी द्यायची याची मुभा शाळांना असली तरी विद्यार्थी व पालकांचा विचार त्यांनी करायला हवा. तसेच या कालावधीत परीक्षा तर घ्यायलाच नकोत. सरकारी आदेश धुडकावून लावणाऱ्या अशा शाळांविरोधात शिक्षण विभागाने कडक कारवाई करावी, जेणेकरून या शाळा पुढच्या वेळी विद्यार्थी आणि पालकांना असा मन:स्ताप देणार नाहीत, अशी मागणी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.