म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा छडा लावण्यात तपास यंत्रणांना अपयश येत असून त्यामागे जहाल आरोपींचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा असलेला अभाव हे प्रमुख कारण आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी केला आहे.
डॉ. दाभोलकर यांची हत्या घडवण्यामागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात इतक्या वर्षांनंतरही सीबीआयला यश आलेले नाही. त्याचप्रमाणे पानसरे हत्या प्रकरणातही महाराष्ट्र एसआयटीला यश आलेले नाही. यासंदर्भात दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांनी पूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. त्यावरील ऑगस्ट-२०१७मधील सुनावणीत उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना तपासाच्या पारंपरिक पद्धती न वापरता आधुनिक पद्धती वापरण्याचा सल्ला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर, हमीद यांनी आपले म्हणणे मांडणारे प्रतिज्ञापत्र नुकतेच दाखल केले.
'समाजातील काही जहाल प्रवृत्तींकडून पद्धतशीरपणे काही माणसांचे 'ब्रेनवॉश' केले जाते. यासंदर्भात संबंधित व्यक्तींना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देताना वारंवार ठरलेल्या सूचना दिल्या जातात. तसेच त्या व्यक्तींना विशिष्ट प्रकारेच विचार करण्यास आणि आपली मते सोडून विशिष्ट मत स्वीकारण्यास भाग पाडले जाते. अशाप्रकारे वारंवार मानसिक व भावनिक प्रभाव पाडल्यानंतर त्या संबंधित व्यक्ती प्रसंगी आपला जीव देण्यास किंवा एखाद्याचा जीव घेण्यासही तयार होतात. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती जेव्हा पकडल्या जातात तेव्हा तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून चौकशीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना ते बेमालूमपणे व सराईतपणे बगल देतात. कारण त्यांच्या मेंदूमध्ये तसा विशिष्ट प्रकारचा बदल घडवण्यात आलेला असतो आणि त्यांच्या मेंदूत विशिष्ट प्रकारचे अडथळे निर्माण करण्यात आलेले असतात. त्यामुळे अशांची चौकशी करून त्यांच्याकडून सत्य बाहेर काढणे तपास यंत्रणांना अत्यंत जिकिरीचे होते. म्हणूनच अशा व्यक्तींची चौकशी करण्यासाठी विशेष ज्ञान व विशिष्ट प्रशिक्षण असलेले अधिकारी आवश्यक असतात. दाभोलकर व पानसरे हत्या प्रकरणात अशाप्रकारे विशेष ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांची मदत अद्याप घेण्यात आलेली नाही', असे म्हणणे हमीद यांनी प्रतिज्ञापत्रात मांडले आहे.