केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आश्वासन
नांदेड : संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने थैमान घालून पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले.
शनिवारी दानवे यांनी अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील आनंद कल्याणकर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयाची भेट घेतली. कल्याणकर कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शेतातील पिकांची पाहणी केल्यानंतर दानवे म्हणाले, 'सध्या राष्ट्रपती राजवट लागू असली तरी भाजपचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. राज्याला अहवाल केंद्राकडे सादर झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ. राज्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून नुकसान भरपाईचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय घेऊ.'
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी दानवे यांच्यासमोर शेतीचे नुकसान, पडलेला बाजारभाव या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली. यावेळी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, तहसीलदार सुजीत नरहरे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे थांबा पुन्हा युतीचे सरकार येईल : दानवे
सायंकाळी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सरकार येणार नसल्याचा दावा केला. जर अशा प्रकारचे सरकार आले तर ते टिकणार नाही. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. राज्यातील जनतेने युतीला जनादेश दिला आहे. परंतु, शिवसेनेकडून त्याचा अनादर होत आहे. भाजप-सेनेची युती कुठे तुटली असा सवाल करुन थोडे थांबा पुन्हा युतीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दानवे यांनी शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले. राजकीय भाष्य करण्याऐवजी शेतकऱ्याला मदत करण्याचे प्राधान्य असल्याचे दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.
फोटो ओळी..
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील आनंद कल्याणकर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन सांत्वन केले.