म. टा. प्रतिनिधी, मुंबई लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही समजू शकतो. परंतु सर्वच बुथवर होतो हे शक्य वाटत नाही. हे सगळे धक्कादायक असून आम्ही यावर अभ्यास करतोय, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. तसेच लोकसभेपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात वेगळे चित्र असेल. त्यासाठी राष्ट्रवादी आपल्या मित्रपक्षांसोबत जोमाने कामाला लागली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच पाटील यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या अनेक मतदारसंघांत आपण प्रचार केला. त्यावेळी राष्ट्रवादीला वातावरण अनुकूल होते. आम्हाला ९ ते १२ जागा मिळतील असे वाटत होते. मात्र हा निकाल धक्कादायक आहे, असे ते म्हणाले. उमेदवारांशी बोलल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. शेवटी पराभव हा पराभव असतो. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असेही पाटील यांनी सांगितले. पारोळा येथील कार्यकर्त्याने लोकांशी चांगला संपर्क ठेवला असताना फक्त ८ मते मिळाल्याचे उदाहरण पाटील यांनी दिले. सुरुवातीपासून आम्ही वंचित बहुजन आघाडीशी चर्चा केली होती. परंतु चर्चा सुरू असतानाच ते उमेदवार जाहीर करत होते. त्यामुळे त्यांना आमच्याशी आघाडी करायची नव्हती. शेवटी त्यांनी ४८ उमेदवार उभे केले. त्यांना काही ठिकाणी चांगले मतदान झाले आहे. त्याचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला आहे, अशी स्पष्ट कबुलीही पाटील यांनी दिली. प्रकाश आंबेडकर हे विधानसभेच्या २८८ जागा लढवणार असल्याचे तुम्ही सांगत आहात. त्यांना शुभेच्छा, परंतु त्यांच्याशी चर्चा नक्की करू. राज ठाकरे यांच्यामुळे राज्यभर जागृती चांगली झालेली होती हे नक्की, असेही पाटील म्हणाले. 'जनता फार हुशार आहे. लोकसभेला दिलेला कल विधानसभेला राज्यात देईल असे वाटत नाही', असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
विधानसभेला चुका सुधारू
म टा प्रतिनिधी, मुंबईलोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही समजू शकतो परंतु सर्वच बुथवर होतो हे शक्य वाटत नाही...
MT 25 May 2019, 4:00 am