म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे चिरंजीवांच्या हट्टापायी पक्षांतर करण्याच्या राज्यात सुरू झालेल्या राजकीय नाट्याचा पुढचा प्रयोग नवी मुंबईत रंगण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा दबाव आणि राजीनाम्याच्या इशाऱ्यांचे नाट्य उभे करण्यास सुरुवात झाली आहे. ऐरोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक अखेर आपले वडील गणेश नाईक यांचे मन वळवण्यात यशस्वी ठरले असून, येत्या काही दिवसांतच नाईक भाजपमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संदीप नाईक गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रही आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दुखवायचे नाही, अशी भूमिका गणेश नाईक यांच्याकडून घेतली जात होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दबाव वाढवून वडिलांचे मन वळविण्यात संदीप नाईक यांना यश आल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रवेशासाठी अनुकूल नव्हते. मात्र, त्यांच्याकडूनही आता हिरवा कंदील मिळाला असून, भाजपचा केंद्रातील एक नेता आणि एका बड्या उद्योजकाने यासाठी महत्त्वाची भूमिका
बजावल्याचेही समजते. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करायचा, या प्रवेशाबाबत अधिकृत आणि अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार गणेश नाईक यांना द्यायचे आणि त्यासाठी आज, मंगळवारी नाईक यांची भेट घ्यायची असा निर्णय बैठकीत झाला. २०१४पासून सातत्याने पराभव होत असल्याने बालेकिल्ला निसटण्याची नाईक कुटुंबाला भीती आहे. संबंधित वृत्त…४