म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबईमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मलनि:सारण वाहिन्या, महानगर गॅसची पाइपलाइन, पाण्याची पाइपलाइन, भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे आदी विकासकामे सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालकांना व पादचाऱ्यांना रस्त्याने चालणेही जिकरीचे झाले आहेत. हे रस्ते डोकेदुखी ठरत आहेत.
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना एक भाग हा पूर्णपणे बंद करण्यात येतो. उरलेला अर्ध्या रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असते. त्यामुळे समोरासमोर दोन्ही वाहने आल्याने रस्त्यामध्ये वाहतूककोंडी होते. वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकीचे प्रसंगही वारंवार घडतात. ऐरोली येथील पटनी कंपनीचा रस्ता, रबाळे-महापे औद्योगिक पट्टा, ठाणे-बेलापूर रस्ता, सायन-पनवेल महामार्ग आदी ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत ती संथ गतीने होत असल्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना आपल्या मार्गात बदल करावा लागत आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, तेथे रस्ता बंद असल्याचा फलकही लावण्यात न आल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. वाहनचालकांना व पादचाऱ्यांना पुढे जाऊन माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण होऊनही वाळू, सिमेंट, भुशाची कस तशीच पडून रहिल्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनादेखील घडत आहेत.
महानगरपालिका, महाविरण, महानगर गॅस, रिलायन्स आदी कंपन्यांचे एकमेकांशी विचारविनिमय नसल्यामुळे रस्ते वारंवार खोदण्यात येतात. जर भूमिगत विद्युात वाहिन्या टाकलेल्या असताना एखाद्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाला तर ज्या ठिकाणी नादुरुस्त झाली आहे, ते शोधण्यासाठी रस्ता खोदण्यात येतो. तसेच रस्ते खोदल्यांनतर ते पूर्णपणे बुजवण्यात येत नसल्यामुळे रस्त्यांना खड्डे तसेच राहतात. रस्त्यांची कामे सुरू असताना फूटपाथवर रस्त्यांतील डेब्रिज टाकण्यात येते, पंरतु रस्त्यांची कामे झाल्यानंतर कच्चा माल तसाच फूटपाथवर राहतो. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत, तेथील साहित्य हटवून रस्ता स्वच्छ करावा, अशी मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.