म. टा. प्रतिनिधी, मुंबई
भारतीय हवाई दलाने बालाकोटवर केलेल्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला, श्रीनगर व एकंदरच जम्मू-काश्मीरमध्ये कमालीच्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्याच दिवशी सकाळी हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर कोसळून सहा जवानांना वीरमरण आले होते. त्यामध्ये नाशिकच्या एका मराठी वैमानिकाचाही समावेश होता. परंतु आता हे हेलिकॉप्टर भारतीय क्षेपणास्त्रानेच पाडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. यामुळेच हवाई दलाने श्रीनगर हवाई तळाच्या प्रमुखांची तडकाफडकी बदली केली आहे.
हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानात जाऊन कारवाई केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या २४ लढाऊ विमानांनी २७ फेब्रुवारीला जम्मू क्षेत्रातील राजौरीकडे कूच केले होते. त्याच दिवशी सकाळी बडगाम जिल्ह्यात हवाई दलाचे 'एमआय१७ व्ही-५' हे वाहतूक हेलिकॉप्टर कोसळले. नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हे त्या हेलिकॉप्टरचे सह वैमानिक होते. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त होते. आता मात्र हवाई दलानेच डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे हे हेलिकॉप्टर पडले, असा धक्कादायक प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
हवाई दलाने अधिकृत जाहीर न केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरवर 'आयएफएफ' (आयडेंटिफिकेशन ऑफ फ्रेंड ऑर फो) ही यंत्रणा असते. या यंत्रणेमुळे ते हेलिकॉप्टर शत्रूचे नसून भारतीय हवाई दलाचेच आहे, हे जमिनीवरून हवाई नियंत्रण करणाऱ्यांना कळू शकते. परंतु संबंधित घटनेत वैमानिकांनी ही यंत्रणा बंद करून ठेवली होती.
यासाठी डागले क्षेपणास्त्र
बालाकोट हल्ल्यानंतर तणावपूर्ण स्थिती असताना, आकाशात अनोळखी हेलिकॉप्टर असल्याचे रडारवर दिसले व श्रीनगर हवाई तळाच्या शस्त्रप्रमुखांनी लागलीच क्षेपणास्त्र डागण्याचे आदेश दिले.
अशी घडली चूक
शत्रूचे व स्वदेशी विमान-हेलिकॉप्टर ओळखण्यासाठी विशेष यंत्रणा असते. त्याद्वारे हवाई नियंत्रण करणाऱ्यांना विमान कुणाचे ते ओळखणे शक्य होते. मात्र, त्या वेळी ही यंत्रणा बंद होती.