म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चा ६१वा वर्धापन ३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील ढोकाळी भागातील हायलँड मैदानात आयोजित करण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा संकल्प या कार्यक्रमात होणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३ ऑक्टोंबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली होती. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाविरोधात देशात समर्थ विरोधी पक्ष निर्माण करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प होता. त्यानुसार सर्व जाती-धर्मीयांचा सर्वसमावेशक पक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी दरवर्षी पक्षाचा स्थापना दिवस आम्ही साजरा करतो, असे आठवले म्हणाले. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर मीनाक्षी शिंदे, खा. कपिल पाटील, खा. राजन विचारे, आ. संजय केळकर. निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक आदींना आमंत्रित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.