म. टा. वृत्तसेवा, पनवेल
उंचच्या उंच मानवी थर लावून कलाकृतीचे दर्शन घडवणाऱ्या आणि पारंपरिक सण-उत्सव साजरा करणाऱ्या गोविंदा पथकांचा विमा महापालिकेने काढावा, अशी मागणी पनवेल महापलिकेचे विरोधी पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
काही दिवसांवर गोपाळकाला सण येऊन ठेपला आहे. हिंदू संस्कृतीत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उंच हंडी बांधून, थर रचून हंडी फोडली जाते. मानवी मनोरे रचून अनेक तरुण जिवाची बाजी लावत असतात. हंडी फोडताना रचलेला मनोरा कोसळून अनेक मुले जखमी होतात, तर काहीजण यात जीवदेखील गमवतात. महापालिका क्षेत्रात अनेक दिवस सराव करून सामाजिक संस्थांनी, राजकीय पक्षांनी बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी बाहेरील अनेक पथके येतात. याशिवाय शहरातीलअनेक पथके हंडी फोडतात. मोठ्या संख्येने तरुण सहभागी होत असल्यामुळे पालिका क्षेत्रातील नोंदणीकृत गोविंदा पथकांना महापालिकेने विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणीचे पत्र म्हात्रे यांनी नुकतेच महापालिका आयुक्तांना दिले. यावेळी शेकापच्या नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, प्रीती जॉर्ज म्हात्रे आदी उपस्थित होत्या. दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर त्यांना अपघाती विम्याचे संरक्षण मिळावे, ही आमची भूमिका असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.