म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर
'देशात शाळा कमी आणि मंदिरे अधिक आहेत, त्यामुळे बौद्धिक कमजोरी आढळते. नव्या पिढीला दिशा देण्यासाठी प्रत्येक गावात ग्रंथालये सुरू व्हायला हवीत. संस्कारशील पिढीसाठी बौद्ध विहारांचे संरक्षण करा. जातीच्या कॉलममुळे आरक्षणाचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. बौद्ध समाजबांधवांनी संघटित होणे गरजेचे आहे,' असे आवाहन पूर्णा येथील भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्यावतीने वैशाली बौद्ध विहाराच्या प्रांगणात आयोजित २८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी भदन्त बोधीपालो महाथेरो (औरंगाबाद), यशकाश्यपायन महाथेरो, विनयरक्षित थेरो (बेंगळुरू), रतनबोधी थेरो (चंद्रपूर), पय्यानंद थेरो (लातूर), आर. आनंद (वसगडे), विमलकिर्ती गुणसिरी थेरो (नागपूर), संबोधि (वसगडे) उपस्थित होते.
सकाळी शिरोळ येथून आणलेल्या धम्मज्योतीचे स्वागत परिषदस्थळी करण्यात आले. यानंतर धम्म ध्वजारोहन झाले. त्यानंतर भिक्खू संघाचे आगमन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ व रमाई उपासिका संघाच्यावतीने भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले. दुपारी एक वाजता धम्म परिषदेचे उद्घाटन कल्याणमित्र एस. पी. गायकवाड यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. चंदनशिवे यांनी ठरावांचे वाचन केले. शशिकांत माळगे यांनी आभार मानले. याप्रसंगी आमदार उल्हास पाटील, शरदचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, नगरसेवक संभाजी मोरे, प्रेमला मुरगुंडे, सुलक्षणा कांबळे, रजनीकांत कांबळे, दादा पाटील-चिंचवाडकर तसेच महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते.
००००