म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर जनौषधी दुकाने उपलब्ध करून देण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. प्लास्टिक बाटल्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अशा बाटल्या क्रश करणाऱ्या मशिन्सही बसवण्याचा रेल्वेचा विचार असून प्रवाशांच्या हिताच्या असलेल्या या दोन्ही उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे.
पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गांवरील सर्वच स्थानकांवर जनौषधी दुकाने, बॉटल क्रश मशिन्स यांना जागा देण्याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच सूचना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत गोयल यांनी या दोन्ही उपक्रमांविषयी सूचना केली. त्यानंतर रेल्वे यंत्रणेने त्यासंदर्भात चाचपणीचे काम हाती घेतले आहे. सध्या याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चर्चगेट, सीएसएमटीसारख्या मोठ्या स्थानकांत औषधांची दुकाने आहेत. पश्चिम रेल्वेवर बॉटल क्रश मशिन्सचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे. त्याप्रमाणे अन्य काही स्थानकांवर त्यांचा वापर शक्य होऊ शकेल. पण, सँडहर्स्ट रोड, मशिद बंदर, लोअर परळ, मालाड, विद्याविहार आदी अरुंद स्थानकांवर अशी दुकाने वा मशिन्स बसवण्याबाबत अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाभ की अडचण?
सर्वच रेल्वे स्थानकांवर दोन्ही उपक्रम राबवणे कितपत व्यवहार्य ठरले याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. मोठ्या स्थानकांवर जागा उपलब्ध करून जनौषधी दुकाने, बॉटल क्रश मशिन सुरू करता येऊ शकतील. पण, मध्यम वा छोट्या स्थानकांवर त्यांची अंमलबजावणी करणे कठीण ठरू शकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळलेली असताना या दोन नव्या उपक्रमांनी जागा व्यापली जाऊन प्रवाशांना अडचण होईल, असाही मतप्रवाह आहे.