सहगल यांच्या स्वागताची
तयारी केल्याचीही माहिती
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांना नकार-निर्णय कळविणाऱ्या ई-मेलचा इंग्रजी मसुदा आयोजकांच्या विनंतीमुळे करून दिला, असा दावा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. आयोजक अडाणी असल्याचे भासवविण्याचा प्रयत्न जोशींनी चालविला असल्याची तिखट प्रतिक्रिया यानिमित्ताने साहित्यवर्तुळात व्यक्त होत आहे. खरे तर एकतर्फी निर्णय घेत जोशींनीच पाठविलेल्या मूळ इंग्रजी मसुद्यात आयोजकांना नीट सुधारणा कराव्या लागल्याचे तथ्य पुढे आले आहे.
नकारपत्राच्या जोशी यांनी पाठविलेल्या मसुद्यात आयोजकांकडून व्याकरणाची दुरुस्ती करून काही संयुक्तिक वाक्प्रचारांचाही समावेश करण्यात आला. आयोजक संस्थेत इंग्रजीच्या अनुभवी प्राध्यापकांचा समावेश असल्यामुळे महामंडळ अध्यक्षांचा प्रयत्न आयोजकांना फारच झोंबला. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते हे मराठीचे निवृत्त प्राध्यापक आहेत. दोन विद्यापीठांतील पीएच.डी.चे गाइड आहेत. त्यांचे इंग्रजी उत्तम आहे, हे परखडपणे सांगण्यात आले. बोलवायचे नसते तर सहगल यांच्यासाठी नागपुरातील नामवंत हॉटेल आम्ही कशाला आरक्षित केले असते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्यावर किंचितही संशय असणारे कुणीही आम्ही सहगल यांच्या निवास-स्वागताची पूर्ण व्यवस्था केली याची खातरजमा करू शकतात, असे संमेलनाच्या आयोजकंकडून कळविण्यात आले आहे.
यवतमाळातील पहिल्या दिवशीच्या बैठकीत जोशी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ ओडिशी साहित्यिक प्रतिभा राय यांचे नाव सुचविले होते. आयोजकांनी त्या नावाला संमती दिली. मात्र राय यांनी नकार कळविला. त्यानंतर जोशींनीच सहगल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तोदेखील आयोजकांनी सहर्ष मान्य केला. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री संमेलनाला उपस्थित असतील या परंपरेची आठवण जोशी यांनीच आयोजकांना करून दिली असे कळते. यासोबतच, २७ ऑक्टोबरला यवतमाळातील हॉटेल माई येथे झालेल्या मार्गदर्शन समितीच्या पहिल्या बैठकीत डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावाचा उल्लेखही झाला नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत ते नाव आले. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नयनतारा सहगल यांना विनंती करणारा ई-मेल पाठविण्यात आला. जोशींकडून आलेल्या निमंत्रणाच्या त्याही ई-मेलमध्ये सुधारणा कराव्या लागल्या. ई-मेल प्राप्त होताच सहगल यांनी होकार कळविला. वयाचा विचार करून देऊ केलेल्या सर्व सुविधांबद्दल सहगल यांनी आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती, अशी माहिती आयोजकांनी दिली.
महामंडळाकडून आलेल्या पत्रिकेत भाऊसाहेब पाटणकर यांच्या नावापुढे 'शायर' आणि शिवा राऊत यांच्या नावापुढे 'कवी' ही अक्षरे जोडण्याची मौलिक सुधारणाही आयोजकांनी केली होती, असे समजते. या पार्श्वभूमीवर आयोजकांचे अज्ञान जगजाहीर करण्यापेक्षा संमेलनाच्या यशस्विततेसाठी सक्रिय व्हावे, अशी नम्र विनंती साहित्यप्रेमींनी महामंडळाच्या अध्यक्षांना भेटून केली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.