म. टा. प्रतिनिधी, लातूर
प्रशिक्षणार्थींनी देश प्रथम हेच ध्येय हे लक्षात ठेवावे, असे आवाहन केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. देवेंद्रजित सिंह यांनी केले.
केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या बावीसाव्या प्रशिक्षणार्थी तुकडीचा दीक्षान्त समारंभ शनिवारी पार पडला. याप्रसंगी डॉ. सिंह बोलत होते. डॉ. सिंह म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत या प्रशिक्षण केंद्रातून सात हजारहून अधिक पोलिसांनी प्रशिक्षण घेतले आहे. नव्या पोलिसांनी ४४ आठवड्याचे खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल हे जगातल सर्वात मोठे अर्ध सैनिक दल आहे. देशाच्या संरक्षणाचे संस्कार आणि प्रशिक्षण या पोलिसांना मिळालेले असते. या दलातील शिपाई हे तत्परतेने जबाबदाऱ्यांचे पालन करीत असतात. त्यांच्यामध्ये उच्च दर्जाची शिस्त, निष्पक्ष दृष्टीकोन आणि उच्च विचारसरणी असते. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानासाठी सर्वात जास्त प्रभावशाली दल म्हणून त्याची ओळख आहे.'
दीक्षान्त समारंभात निष्ठेची शपथ दिल्यानंतर प्रशिक्षणार्थीनी चित्तवेधक, चित्तथरारक अशी प्रात्यक्षिके करून दाखवली. या समारंभाला लातूर शहरातील विविध शाळातील विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी...
लातूर येथील दीक्षान्त समारंभानंतर प्रशिक्षणार्थींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखवली.