म. टा. प्रतिनिधी, हडपसर
'राज्यात २६५ ठिकाणी रेल्वे फाटक आहेत. या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी होते. मात्र, भाजप सरकार आल्यानंतर ज्या ठिकाणी जास्त वाहतूक कोंडी होते अशा १७० ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाची पायाभरणी केली आहे. यामधील अनेक ठिकाणची कामे पूर्ण होऊन वाहतूक कोंडी दूर झाली आहे. येत्या दोन वर्षांत रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करणार आहोत,' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. घोरपडी येथे दिवसातून १०४ वेळा रेल्वे येते आणि जाते. त्यामुळे १०४ वेळा रेल्वे फाटक बंद करावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रेल्वे उड्डाणपुलामुळे ही समस्या दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिका प्रभाग क्र.२१ घोरपडी येथील पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार व माजी मंत्री दिलीप कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थानिक नगरसेविका हिमानी कांबळे, मंगला मंत्री, लता धायरकर, उमेश गायकवाड यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असून, त्याचे बदल नागरिकांना दिसून येत आहेत, असा दावा महापौर मुक्ता टिळक यांनी केला. २०२२ पर्यंत शहरातील पीएमपीच्या डिझेल बसच्या जागेवर इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. त्यासाठी प्रयत्न सुरू असून, आम्ही नुसते बोलत नाही तर काम करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पुलासाठी १२५ कोटी रुपये खर्च येणार आहे. चालू आर्थिक वर्षात २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून सुरुवातीला पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील काम सुरू केले जाणार आहे. त्यानंतर पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील काम केले जाणार आहे. पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिलीप कांबळे आणि योगेश टिळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
...
शिवसेनेकडून नाराजी
भूमिपूजन परिसरात भाजपने मोठे फलक लावून रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनची जाहिरात केली. परंतु, शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनीच या रेल्वे उड्डाणपुलासाठी २००९ पासून पाठपुरावा केल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने केला. मात्र, भाजपच या पुलाचे श्रेय घेत असून, आढळरावांना बोलण्याची संधी न दिल्याबद्दल शिवसेनेचे माजी विभागप्रमुख दिलीप कवडेसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
...