\B हल्ल्याच्या अॅलर्टमुळे सुरक्षेत वाढ\B
पश्चिम रेल्वेमार्गावर दक्षतेच्या सूचना
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
दहशतवादी संघटनांकडून मुंबईतील लोकल मार्ग उडवून देण्याचा अॅलर्ट आल्याने पश्चिम रेल्वेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाकडून रेल्वे रूळ उडवून देण्याचा कट शिजत असल्याचा संदेश बुधवारी फिरला. वरिष्ठ पातळीवर आलेल्या या ईमेलनंतर तातडीने योग्य उपाययोजना हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोकल मार्गांवर रुळांचे तुकडे ठेवून सुरक्षेला भगदाड पाडण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. मात्र, दहशतवादी संघटनांनी रेल्वे रूळ उद्धवस्त करण्याचा डाव रचल्यास त्या प्रमाणात सावध राहण्याची गरज आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात बुधवारी याबाबतचा ईमेल येताच, वरिष्ठ पातळीवर धावपळ सुरू झाली. त्याकडे गांभीर्याने पाहत धोक्याचा संदेश कोणत्या संघटनांकडून आला का, याचाही तपास केला जात आहे.
संवेदनशील ठिकाणांकडे लक्ष
रेल्वे बोर्डानेही त्याची दखल घेतली असून बोर्डाने मुंबई विभागातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यात रेल्वे सुरक्षा बलाप्रमाणेच (आरपीएफ) इंजिनीअरिंग विभागासही सावध राहण्यास सांगितले आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील संवेदनशील ठिकाणी जास्त लक्ष ठेवावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी संबंधित ठिकाणी सुरक्षारक्षक किंवा कर्मचारी नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वीही काही रेल्वे दुर्घटनांमध्ये दहशतवादी संघटनांचा हात असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.