अ‍ॅपशहर

महाआघाडीच्या नेत्यांकडून सारवासारव

प्रकल्पग्रस्तांची अनेक वर्षे जुनी वाढीव घरे नियमित करण्याच्या मागणी मंजूर करू या योजनेला 'दिबांचे' नाव देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 23 Jun 2021, 4:22 pm
म. टा. वृत्तसेवा, पनवेलः प्रकल्पग्रस्तांची अनेक वर्षे जुनी वाढीव घरे नियमित करण्याच्या मागणी मंजूर करू या योजनेला 'दिबांचे' नाव देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 'दिबां'ना विरोध नाही. मात्र, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यास आग्रही आहोत, अशी भूमिका घेऊन गोची झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम international airport


प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सुरुवातीला आग्रही असणाऱ्या नेत्यांची शिवसेनेच्या भूमिकेमुळे अडचण झाली. आपल्या भूमिकेवरून 'यू टर्न' घेऊन महाविकास आघाडीतील शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे 'दिबां'चे नाव घेण्यासाठी आग्रही असलेल्या नेत्यांना राज्यातील सत्ताबदलामुळे नवी भूमिका घ्यावी लागली. भाजपने स्थानिक प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांसोबत राहत 'दिबां'च्या नावासाठी आग्रह धरल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. भविष्यात या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत, याची धास्ती असलेल्या नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भेट घेऊन सिडकोकडून बेकायदा ठरविण्यात आलेली वाढीव घरे नियमित करण्याची अनेक वर्ष प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करून घरे नियमित करण्याच्या योजनेला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव दिले जाणार आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे निवेदन दिले आहे. आम्हीही 'दिबां'चा आदर करतो, तुमच्या एवढेच आम्हाला 'दिबा' प्रिय आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. ही मागणी करण्यासाठी पनवेल महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
राजकारण म्हणून महाविकास आघाडीतील नेत्यांना 'दिबां'च्या नावावरून माघार घ्यावी लागली आहे. मात्र, या नेत्यांकडून अनेक वेळा 'दिबां'च्या नावासाठी आग्रह धरण्यात आलेला आहे. 'दिबां'चे नाव योजनेला देणे म्हणजे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या आम्ही सोबत आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

मयूर भोईर, शेकाप कार्यकर्ता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज