म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच सोमवारी खड्ड्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. मात्र, या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करीत नवी मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी सानपाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. सानपाड्याजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका मुलाला जीव गमवावा लागला, तर एक जण जखमी झाला. यामुळे खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत विभागाला निवेदन देऊनही खड्डे बुजवले जात नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याची डागडुजी व देखभाल करणे शक्य नसेल तर महापालिकेकडे हा रस्ता डागडुजीसाठी देण्याची मागणी मनसेने केली आहे.
कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रामधून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी २० ते २४ किलोमीटर लांबीचा सायन-पनवेल महामार्ग सोयीचा आहे. मात्र, आता या महामार्गाची चाळण झाली आहे. पनवेल ते वाशी हा प्रवास करण्यास तब्बल दोन तासांचा अवधी लागतो. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे महामार्ग पाहणी दौऱ्याचे केवळ नाटक करत आहेत, असा आरोप मनसेने केला. या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, तर उग्र आंदोलन मंत्रालयात करण्याचा जाहीर इशारा मनसेने दिला आहे. सोमवारी सकाळी ठाणे-वाशीपासून कळंबोलीपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. दहा मिनिटांच्या रस्त्यावर दोन तास वाहने अडकून पडली होती. खारघर ते कळंबोली हा मार्ग तर पूर्णपणे वाहतूककोंडीत होता.