म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
नवी मुंबईमध्ये आता भाजपला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई भाजपचे माथाडी कामगार अध्यक्ष किशोर आंग्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये असंतोषाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरण्यास सुरुवात केली. त्यानुसार, बुधवारी भाजपच्या माथाडी संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष किशोर (अन्नु) आंग्रे, समाजसेविका गौरी किशोर आंग्रे, भाजपचे नवी मुंबई सरचिटणीस शैलेंद्र आंग्रे, पप्पू पटेना, मंगेश टेमकर, योगेश ढाके, किरण करंजळे, उमेश भोसले, हर्षल भोईर, बॉबी अग्रवाल, जगदीश चौधरी, चंद्रजीत बैजीनाथ यादव या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी, कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, नवी मुंबई प्रवक्ते अफसर इमाम आदी उपस्थित होते. अन्नु आंग्रे हे नारायण राणे यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.