म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे व मुंबई-बडोदा मार्गावर मेमू गाड्या चालवण्याचे प्रयत्न रेल्वेने सुरू केले आहेत. यासाठी पुढील आठवड्यात चाचणी घेण्यात येणार असून, या मार्गांवर वेगवाढीची अडचण नसल्याचा विश्वास रेल्वेला आहे.
सध्या मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक अंतरासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. तर मुंबई-बडोदा हे अंतर कापण्यासाठी रेल्वेला सहा तासांचा वेळ लागतो. पुणे-नाशिक दरम्यान घाट मार्ग वगळता अन्य मार्गावर वेग वाढवून कमी वेळेचे लक्ष्य गाठणे शक्य आहे. बडोदा मार्गावर राजधानी ताशी ११०-१३० किमी वेगाने धावते. यामुळे येथेही अडचण नाही. मात्र ट्रेन वेगाने धावण्यासाठी रुळांच्या दोन्ही बाजूला कुंपण असणे आवश्यक असून, सध्या तिन्ही मार्गांवर असे कुंपण नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्याच्या दुसऱ्या ट्रेनची बांधणी पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप या एक्स्प्रेसचा मार्ग निश्चित झालेला नाही. पश्चिम रेल्वेसह अन्य क्षेत्रीय रेल्वेने या वंदे भारत चालवण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई रेल्वे विभागात पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या रेल्वे मंडळाकडे ट्रेन, तंत्रज्ञान वा कोणत्याही गोष्टींची कमतरता नाही. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी लोकलचा वेग ताशी ११० करण्याची चाचणी घेण्यात येईल. सद्यस्थितीत लोकल ताशी १०० किमीच्या वेगावर लोकल धावतात.
तुफान पावसातही मुंबई धावणार
मध्य रेल्वेने केलेल्या पावसाळी तयारीबाबत रेल्वे मंडळ सदस्य राजेश अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले. मध्य रेल्वेच्या उपाययोजना आणि तयारी लक्षात घेता २४ तासांत २०० मिमी पाऊस झाला तरी मुंबईची लाइफलाइन बंद होणार नाही. परिणामी भर पावसातही मुंबई धावतच राहणार असल्याचा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला.