म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कॉमर्स शाखेसाठी क्षमतेपेक्षा अधिक आलेल्या अर्जानुसार वाढीव तुकड्यांची क्षमता संपल्यानंतरही प्रवेश क्षमता आणि आलेले अर्ज यांच्यातील तफावत कायम राहिल्यास उर्वरित विद्यार्थ्यांना कॉमर्स शाखा किंवा माध्यम बदलण्याची वेळ येणार आहे. क्षमता व अर्ज यांच्यातील तफावतीचा फटका गुणवत्तेनुसार दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चिती होणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. कॉमर्स शाखेकडे कल असलेल्या मात्र गुणवत्तेनुसार दुसऱ्या फेरीत प्रवेशयादीत समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी कस लागणार आहे.
नव्याने आलेला जीएसटी कायदा, अर्थकारणाच्या बदलत्या संकल्पना, गुंतवणुकीच्या पर्यायांमुळे वाढलेल्या करिअर संधी यामुळे वाणिज्य शाखेकडे यावर्षी क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यावर्षी वाणिज्य शाखेला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. अर्ज भरण्याच्या मुदतीअंती प्रवेश क्षमतेपेक्षा वाणिज्य शाखेला १३ अर्ज जास्त आले आहेत. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही वाणिज्य शाखेला पसंती मिळाल्यास क्षमता व अर्ज यांचे गणित व्यस्त होण्याची शक्यता आहे. सध्या वाणिज्य शाखा उपलब्ध असलेल्या कॉलेजमधील तुकड्यांमध्ये वाढ करण्याचाही विचार आहे. तीन तुकड्या वाढीव देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त वाढीव तुकड्यांसाठी कॉलेजकडून प्रस्ताव आलेले नाहीत, त्यामुळे सध्याच्या तुकड्यांमध्ये असलेली क्षमता व दाखल झालेले अर्ज यानुसार प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.
शहरातील कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेअंतर्गत इंग्रजी माध्यमासाठी १ हजार ४७ प्रवेश क्षमता असून यासाठी एक हजार ९०१ अर्ज आले आहेत. मराठी माध्यमासाठी ३ हजार ३०० इतकी प्रवेश क्षमता असून २ हजार ४५९ अर्ज आले आहेत. मराठी व इंग्रजी माध्यमासाठी एकूण क्षमता ४ हजार ३४७ इतकी असून दाखल झालेल्या अर्जाची संख्या ४ हजार ३६० इतकी आहे.
...........
कोट
'यावर्षी कॉमर्स शाखेसाठी विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याचे दाखल झालेल्या अर्जाद्वारे स्पष्ट होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे प्रवेशाचे नियोजन करताना पहिल्या फेरीत वाढीव तीन तुकड्यांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. तर दुसऱ्या फेरीत कॉलेजकडून वाढीव तुकडीसाठी प्रस्ताव न आल्यास क्षमतेबाहेरील विद्यार्थ्यांना माध्यम किंवा शाखा बदलण्याशिवाय पर्याय नाही.
सुभाष चौगुले, सहाय्यक शिक्षण संचालक