म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'देशात २००९ ते २०१४ या दरम्यान राज्यात १ लाख ८० हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली होती. तर २०१५ ते २०१८ या कालावधीत राज्यात ३ लाख ३६ हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारपेक्षा आमच्या सरकारच्या काळात झालेली औद्योगिक गुंतवणूक मोठी आहे', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
'रुपया पुन्हा मजबूत व्हायला लागला आहे. राज्याच्या सकल उत्पन्नाशी कर्जाचे प्रमाण १६.१ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात सरकारला यश आले आहे. सकल उत्पन्नाशी राजकोषीय तुटीचे प्रमाण २००९ साली ३.१ टक्के होते, ते आता १.६ टक्क्यांवर आले आहे. मात्र हे करताना राज्याच्या योजनांवरील खर्चाला कुठेही कात्री लावलेली नाही. कोस्टल रोडची संकल्पना पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील आहे. पण एक फुटकी कवडीही ते आणू शकले नाहीत. कोणतीही परवानगी आणू शकले नाहीत. मी स्वतः दिल्लीला जाऊन सर्व परवानग्या आणल्या', असे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले. 'नरिमन पॉइंट ते वर्सोवा कोस्टल रोडचे काम आम्ही सुरू केले. वर्सोवापासून विरारपर्यंत सी लिंक करण्याचे सर्वेक्षण आम्ही सुरू केले आहे', याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.
'नवी मुंबईतील रनवे एप्रिल, २०१०पर्यंत'
'नवी मुंबई विमानतळाबाबत एक रनवे आणि एक टर्मिनल इमारत मार्च, २०२०पर्यंत पूर्ण करू. याआधीच्या सरकारच्या कालखंडात नवी मुंबई विमानतळाला परवानग्या आल्या नव्हत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने या सर्व परवानग्या दिल्या. त्यामुळे हे विमानतळाचे काम जलदगतीने सुरू आहे. एप्रिल, २०१९पर्यंत लँड फीलिंगचे काम पूर्ण करु. एक रनवे मार्च, एप्रिल, २०२०मध्ये सुरू करू', असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.