. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनचालकांनी अद्यापही आपला थकीत दंड भरलेला नाही. त्यामुळे आता रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची तपासणी करून थकीत दंडाची वसुली वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी १३ हजार ३४९ वाहनचालकांकडून थकीत दंडापोटी ६० लाख ४० हजार ९३६ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून शहरात वाहतूक बंद झाली. संचारबंदी जाहीर करण्यात आल्याने वाहतुकीचे नियम तोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, आता लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यात आल्याने नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी ज्या वाहनचालकांवर दंड होता आणि तो अद्यापही भरला नाही, त्यांच्याकडून आता पोलिसांनी दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
वाहतूकबंदीचे आदेश मोडून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांकडून थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकात नाकाबंदी केली आहे. घराबाहेर पडून रस्त्यावर येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून अडविण्यात येत आहे. हेल्मेट परिधान न करणे, सिग्नल मोडणे, पादचारी मार्गावर वाहन थांबविणे, आसनपट्टा न लावणे, मोबाइलवरील संभाषण अशा प्रकारचे नियमभंग नागरिकांकडून सर्रास केले जातात. चौकातील वाहतूक पोलिसांप्रमाणेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते.
वाहतूक पोलिसांनी दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना दंड भरण्याबाबत वारंवार आवाहन केले होते. मात्र, अनेकांनी दंड भरण्यास टाळाटाळ केली होती. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या नाकाबंदीत ३६ हजार ९२६ वाहनांची तपासणी केली. त्यापैकी १३ हजार ३४९ वाहनचालकांनी दंड न भरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडून आतापर्यंत ६० लाख ४० हजार ९३६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अशी होते कारवाई....
नियमभंग केल्यास वाहनचालकांना संदेश पाठविण्यात येतो. नियमभंगाचा प्रकार, दंडाच्या रकमेबाबतची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. ऑनलाइन पद्धतीने दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमभंग करणारा वाहनचालक सापडल्यास त्याच्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाकडून ई-चलन यंत्राद्वारे दंड वसूल केला जातो.
जंतुनाशकाचीही फवारणी
थकलेला दंड वसुलीसाठी पोलिसांनी चौकाचौकात तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. वाहनचालक या कारवाईत सापडल्यानंतर त्याच्याकडून डेबिट कार्डची विचारणा केली जाते. डेबिट कार्डावर जंतुनाशकाची फवारणी केली जाते. त्यानंतर वाहतूक पोलिस ई-चलन यंत्राद्वारे दंड वसूल करतात. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी वाहतूक पोलिस हातमोजे, मास्क, जंतुनाशकाचा वापर करीत आहेत.