म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
रविवारी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा नव्या दमाने 'कोसळलेल्या' पावसाने सोमवारी मुंबई, ठाणे परिसरात दाणादाण उडवली. पहाटेपासूनच तुफान बरसणाऱ्या पावसाने मध्य रेल्वेला जेरीस आणतानाच रस्ता वाहतुकीच्याही नाकीनऊ आणले. पाऊस आणि भरती हे समीकरण जुळल्याने नेहमीप्रमाणे सखल भागांत पाणी साचून मुंबईकरांचा दिनक्रम विस्कळीत झालाच, त्याशिवाय, शीव-माटुंगा स्थानकांदरम्यान रुळांवर साचलेले पाणी, लोणावळा घाटात मालगाडीचे डबे घसरणे, कर्जत-खोपोली दरम्यान रुळांवर झाड पडणे यांमुळे मुंबई-पुणे मार्गावरील मेल-एक्स्प्रेस वाहतूकही बंद पडली होती. एकूणच आठवड्याच्या सुरुवातीलाच पावसाने केलेल्या तुफानी 'बॅटिंग'पुढे सर्व यंत्रणांनी शरणागती पत्करल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. आज, मंगळवारीही मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरींचा अंदाज असून, ठाणे आणि पालघरला तर 'रेड अॅलर्ट' जारी करण्यात आला आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत ९९.८ मिलीमीटर तर कुलाबा येथे ३७.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या तुलनेत बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव या पट्ट्यात सर्वाधिक पाऊस होता. मालाडमध्ये सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत तब्बल ३०० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला. पावसाचा एकूणच जोर लक्षात घेता पुढील सात दिवसांत समुद्रात ४.७९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने पालिकेने सावधगिरीचा इशारा दिला आहे. नौदलाची नऊ व अग्निशमन दलाची सहा बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलसेवेची दैना उडाली. शीव आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्याने लोकल थंडावल्या. तत्पूर्वी, लोणावळा घाटात मालगाडीचे डबे घसरल्याने आणि कर्जत-खोपोलीदरम्यान रुळांवर झाड पडल्याने मुंबई-पुणे मार्गावरील मेल-एक्स्प्रेस वाहतूकही बंद पडली होती. पश्चिम रेल्वेच्या मरिन लाइन्स स्थानकातील रेल्वे इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असताना बांबू आणि सुरक्षा जाळी ओव्हरहेड वायरवर कोसळून सकाळी मुंबई सेंट्रल ते चर्चगेट धीमा मार्ग तब्बल चार तास बंद राहिला. या कालावधीत तब्बल १०० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.