म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नवे सरकार अवघ्या तीन दिवसांत कोसळल्यानंतर आणि राज्यात महाविकास आघाडीचे नवीन सरकार स्थापन होणार असल्याचे मंगळवारी दुपारी स्पष्ट झाले आणि त्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला, तर शालिमार येथील शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.
राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येत असतानाच भाजपने राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांना फोडून फडणवीस यांनी एका रात्रीत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे भाजपने दोन दिवसांपूर्वीच नव्या सरकारचा जल्लोष आपल्या कार्यालयात साजरा केला होता. परंतु, नवीन सरकार अवघ्या तीन दिवसांतच कोसळले आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी जिंदाबाद, शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर सायंकाळी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर शालिमार येथील शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडला. शिवसेना जिंदाबादच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
भाजपमध्ये सन्नाटा
राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यालयात जल्लोष साजरा केला जात असताना भाजपच्या कार्यालयात मात्र अपेक्षेप्रमाणे सन्नाटा पसरला होता. फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर भाजपच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. परंतु, मंगळवारी फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचा हा आनंदोत्सव औट घटकेचा ठरला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयापासून अंतर राखल्याचे चित्र होते.