म. टा. वृत्तसेवा, ठाणे/नवी मुंबई
मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्तीमुळे या मार्गावरील वाहतूक ठाणे, आनंद नगर, मुलुंड-ऐरोली मार्गे पुढे वळविण्यात आल्याने मंगळवारी पहाटेपासून नवी मुंबईतील ऐरोली-रबाळेपासून ते एमआयडीसीतील सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यावरही वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत हजारो जड-अवजड वाहनांसोबतच बेस्ट, एनएमएमटी व एसटीसह शेकडो खासगी वाहनांचा खोळंबा झाला. त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. बायपासचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत अशीच कोंडी होणार या भीतीने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुणे-गोवा त्याचप्रमाणे शिळफाटामार्गे जेएनपीटीत जाणारी सर्व प्रकारची जड-अवजड वाहने ठाण्यातील आनंद नगर येथून मुलुंड-ऐरोली मार्गे वळविण्यात आली आहेत. त्यामुळे ऐरोलीतील दिवा गावा सर्कल, रबाळे नाका, एमआयडीसी रोड, त्याचप्रमाणे पटनी कंपनी मार्गे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे-बेलापूर मार्गावर सध्या घणसोली ते रबाळे दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तसेच महापे येथे व्हेईक्युलर अंडरपासचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली आहे. ठाण्यातील मुलुंड टोल नाका आणि त्यापुढील ऐरोली टोल नाका येथील वाहनांची ये-जा वाढल्याने या रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा परिणाम ठाणे शहरातील वाहतुकीवरही झाला.
ऐरोली-रबाळे भागातील रस्ते अरुंद असल्याने या भागात वाहनांची संख्या वाढल्यास तत्काळ वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या भागात रहाणाऱ्या नागरिकांना त्याचा विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ऐरोली-रबाळे मार्गे वळविण्यात आलेली जड-अवजड वाहनांची वाहतूक घाटकोपर-मानखुर्द-वाशी मार्गे वळविण्यात आली असती तर ही वाहतूक कोंडी झाली नसती, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईचे वाहतूक पोलिस गायब
पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंडच्या हद्दीत वाहतूक कोंडी होऊनही मंगळवारी सकाळी मुंबईचे वाहतूक पोलिस गायब झाल्याचे चित्र होते. वाहतुकीच्या नियोजनाकरीता कर्मचारी तैनात करा, असे ठाणे वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना फोन करून कळवले होते. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आनंदनगर टोल नाका येथे आणखी एक लेन वाढवण्याची आवश्यकता असल्याचे वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
(फोटोओळ : मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे पनवेल-मुंब्रा महामार्गावरील नावडे फाटा येथे मंगळवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती.
राजेश डांगळे)