मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठीचे मुर्हूत टळत असून आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात शिवसेनेला काही महत्त्वाची खाती देण्यात येऊन त्यांची नाराजी दूर करण्यात येणार आहे.
पितृपक्ष असल्याने गणपती उत्सावानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार घटस्थापनेनंतर करण्याचा मुहूर्त भाजपने काढला होता. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची चर्चा झाली. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर तातडीने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे योजले होते. मंगळवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत आले होते. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तेथे, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर करणार असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीनंतर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा बेत आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आता दिवाळीनंतरचा वेळच राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी आहे.
खडसे, शेलार यांच्याबाबत निर्णय प्रलंबित
दुसरीकडे, राज्य मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह काही भाजप नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय अजून प्रलंबित आहे. कोणत्या बड्या मंत्र्यांची उचलबांगडी करायची, असा प्रश्न भाजपपुढे आहे. त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष पदावर रावसाहेब दानवे यांना कायम ठेवायचे की बदलायचे, यावरही पक्षाच्या केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे याबाबतचे निर्णय प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्तार आणखी पुढे ढकलला गेला आहे.